Tuesday, May 5, 2009

अध्याय दुसरा ।

संजय उवाच ।

तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।

विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥

मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें ।

शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥

तें कुळ देखोनि समस्त । स्‍नेह उपनलें अद्‍भुत ।

तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥

जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।

तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥

म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।

जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥

तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु ।

देखोनि श्रीशारङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥

श्रीभगवानुवाच ।

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।

अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २॥

म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।

तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥

तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।

करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥

तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कहीं न संडिसी ।

तुझेनि नामें अपयशी । दिशा लंघिजे ॥ ८ ॥

तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।

तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥

तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।

पवाडा तुवां केला । गंधर्वांसीं ॥ १० ॥

पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।

ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥

तो तूं कीं आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें ।

अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥

विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु ।

सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ? ॥ १३ ॥

ना तरी पवनु मेघासी बिहे ? । कीं अमृतासी मरण आहे ? ।

पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ? ॥ १४ ॥

कीं लवणेंचि जळ विरे ? । संसर्गें काळकूट मरे ? ।

सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ? ॥ १५ ॥

सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला ? ।

परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥

म्हणौनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।

वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥

सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।

संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥

हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां ।

सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायी ? ॥ १९ ॥

हे असतीये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।

म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३॥

म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरीं ।

हें शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥

तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत ।

तूं अझुनी वरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥

येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे ।

हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥ २३ ॥

तूं आधींचि काय नेणसी ? । कीं हे गोत्रज नोळखसी ? ।

वायांचि काय करिसी । अतिशो आतां ? ॥ २४ ॥

आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ? ।

हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥ २५ ॥

तरी आतां काय जाहलें । कायि स्‍नेह उपनलें ।

हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥

मोहो धरिलीया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।

आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥

हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।

हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥

ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु ।

हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥

अर्जुन उवाच ।

कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।

इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥

देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं ।

आधीं तूंचि विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥

हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।

हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥

देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती ।

तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ ३२ ॥

देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।

हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ? ॥ ३३ ॥

तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे ।

मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥

जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं ।

तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ? ॥ ३५ ॥

वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहले ।

जे यांच्या वधीं अभ्यासिले । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥

मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।

तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें ? ॥ ३७ ॥

जेथींचिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु ।

तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥

गुरुनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।

हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्रुधिरप्रदिग्धान् ॥ ५॥

देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे ।

परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥

हें अपार जें गगन । वरी तयाही होईल मान ।

परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥

वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्रही फुटे ।

परी मनोधर्मु न लोटे । विकरविलाही ॥ ४१ ॥

स्‍नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये ।

परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥

हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि ।

विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥

हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागीं कृपावंतु ।

आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥

ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।

तें मना न ये आघवें । जीवितेसीं ॥ ४५ ॥

हें येणें मानें दुर्धर । जे याहीहुनी भोग सधर ।

ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥

ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे ।

परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥

देवा नवनिशतीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं ।

भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥

ते काढूनि काय किजती ? । लिप्त केवी सेविजती ? ।

मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ॥ ४९ ॥

ऐसें अर्जुन तिये अवसरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।

परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥

हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।

म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥

न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।

यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६॥

येर्‍हवीं माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।

परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥ ५२ ॥

पैं वीरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे ।

ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥

आतां ऐसियांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें ।

या दोहींमाजीं बरवें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥

कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।

यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥

आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।

जें मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥ ५५ ॥

तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे ।

मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥

देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें ।

आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥

तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें ।

जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥

तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता ।

तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥

जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणें अव्हेरु ।

कीं सरितांतें सागरु । त्यजीं केवी ॥ ६० ॥

नातरी अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये ।

तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥

तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी ।

आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥

तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा ।

तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥

न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।

अवाप्य भूमावसपत्‍नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥

हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं ।

तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें ॥ ६४ ॥

एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल ।

परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥

जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्‍ही पेरिलीं ।

तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥

ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे ।

एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥

तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीव बुद्धि ।

एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥

ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला ।

मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥ ६९ ॥

कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे ।

तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥

सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं ।

लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना ? ॥ ७१ ॥

हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी ।

तो धांवया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥

तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।

तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥

म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।

म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥

मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु ।

जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥

तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु ।

जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥

म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु ।

तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥

तेथ सुदशनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।

गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥

आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल ।

मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥

ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।

ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥

संजय उवाच ।

एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप ।

न योत्स्य इति गोविंमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९॥

ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।

पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥ ८१ ॥

आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।

मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ ८२ ॥

ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला ।

तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।

सेनयोरूभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ १०॥

मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें ।

अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥ ८४ ॥

हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी ।

जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥

ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि ।

वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥ ८६ ॥

तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु ।

जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥ ८७ ॥

तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें ।

जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्‍नेह आथी ॥ ८८ ॥

कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं ।

ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥

तैसीं वरिवरी पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।

तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥

श्रीभगवानुवाच ।

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।

गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ ११॥

मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें ।

जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥

तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी ।

आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥

जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।

तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥

तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी ।

हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥

तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? ।

हे अनादि विश्वरचना । तें लटके कायी ? ॥ ९५ ॥

एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती ।

तरी हें वायांचि काय बोलती । जगामाजीं ? ॥ ९६ ॥

हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें ।

आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ॥ ९७ ॥

तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं ।

तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥

कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।

ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥

अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।

तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥ १०० ॥

परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतीसी ।

आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १०१ ॥

देखैं विवेकी जे होती । ते दोहीतेंहीं न शोचिती ।

जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥ १०२ ॥

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।

न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२॥

अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।

आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥

नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी ।

हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥ १०४ ॥

हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे ।

एर्‍हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥ १०५ ॥

जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।

तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ? ॥ १०६ ॥

तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें ।

तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।

तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १३॥

आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक ।

हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥

एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।

परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥

तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।

ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा ।

आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४॥

एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।

परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥

तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।

ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥

एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण ।

तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥

इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।

ते अंतर आप्‍लविती । संगें येणें ॥ ११२ ॥

जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।

तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥

देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।

तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥

मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।

जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥

भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख ।

जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥

सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।

जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥

तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु ।

म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥

देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।

आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥

या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।

ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥

हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।

कां स्वप्‍नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥

देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं ।

हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।

समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५॥

हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोनी न पवती ।

आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥

तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा ।

जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।

उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६॥

आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आईक ।

जे विचारपर लोक । वोळखिती ॥ १२५ ॥

या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।

तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥

सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे ।

परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥

कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ ।

निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥

ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी ।

मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥

कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट ।

तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥ १३० ॥

तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें ।

मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥ १३१ ॥

म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।

निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।

विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७॥

देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता ।

तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ १३३ ॥

हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु ।

तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥ १३४ ॥

जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु ।

तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥ १३५ ॥

अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।

अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ १८॥

आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें ।

म्हणौनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।

उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९॥

तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें ।

मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥ १३७ ॥

तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी ।

तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥

न जायते म्र्यिते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।

अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २०॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।

कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१॥

जैसें स्वप्‍नामाजीं देखिजे । तें स्वप्‍नींचि साच आपजे ।

मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ १३९ ॥

तैसी हे जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां ।

शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥

कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।

परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥

ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।

तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ॥ १४२ ॥

तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं ।

म्हणौनि तू हें नारोपी । भ्रांति बापा ॥ १४३ ॥

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।

तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २२॥

जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।

तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।

नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४॥

हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु ।

म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥

हा प्रळयोदकें नाप्‍लवे । अग्निदाहो न संभवे ।

एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥

अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु ।

सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥१४७ ॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।

तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५॥

हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी ।

ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥

हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना ।

निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥

हा गुणत्रयरहितु । अनादि अविकृतु ।

व्यक्तीसी अतीतु । सर्वरूप ॥ १५० ॥

अर्जुना ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा ।

मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।

तथापि त्वं महाबाहो नैवं शौचितुमर्हसि ॥ २६॥

अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी ।

तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥

जो आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु ।

जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥

तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मीनलें ।

आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥ १५४ ॥

इयें तिन्ही तयापरी । सरसींच सदा अवधारीं ।

भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥ १५५ ॥

म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें ।

जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥

ना तरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना ।

जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥

तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं ।

हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।

तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७॥

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥

ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥

महाप्रळयावसरें । हें त्रैलोक्यहि संहरे ।

म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥

तूं जरी हें ऐसें मानिसी । तरी खेदु कां करिसी ? ।

काय जाणतुचि नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥

एथ आणीकही एक पार्था । तुज बहुतीं परी पहातां ।

दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।

अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८॥

जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें ।

मग पातली व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥

तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती ।

देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥

येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्‍न जैसें ।

तैसा आकारु हा मायवशें । तत्स्वरूपीं ॥ १६६ ॥

ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।

कां परापेक्षां अळंकार । व्यक्ती कनकीं ॥ १६७ ॥

तैसे सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित ।

जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥ १६८ ॥

तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कायी ।

तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥

जयाचि आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत ।

जयालागीं विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥

दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें ।

मुनीश्वर तपातें । आचरताती ॥ १७१ ॥

आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।

आश्चर्यवच्चैनमन्यः श्रुणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९॥

एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ ।

विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥

एकां गुणानुवादु करितां । उपरति होऊन चित्ता ।

निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥

एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले ।

एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥ १७४ ॥

जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत ।

परी माघौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥

तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळवणीसवें एकवटती ।

परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।

तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३०॥

जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।

तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥

जयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें ।

तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥

एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता ।

परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।

धर्माद्धि युद्धाच्छेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१॥

तूं अझुनी कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी ।

स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥

या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें ।

कीं युगचि हें बुडालें । जर्‍ही एथ ॥ १८१ ॥

तरी स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे ।

मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥ १८२ ॥

अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत ।

तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥

अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।

ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥

तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता ।

म्हणौनि तूं आतां । सावध होई ॥ १८५ ॥

वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं ।

जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥ १८६ ॥

जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा ।

कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥

तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां ।

सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥ १८८ ॥

म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं ।

संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥

निष्कपटा होआवें । उसिणा घाई झुंजावें ।

हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ ३२॥

अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें ।

कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥ १९१ ॥

हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें ।

मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥ १९२ ॥

ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें ।

हें कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ॥ १९३ ॥

क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तैं झुंज ऐसें लाहिजे ।

जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणि ॥ १९४ ॥

ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख ।

तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।

ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३॥

आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे ।

तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥

पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें ।

जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥ १९७ ॥

असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल ।

आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥

जैसीं भातारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा ।

तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥

ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे ।

तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥ २०० ॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।

संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४॥

म्हणौनि स्वधर्मु हा सांडसील । पापा वरपडा होसील ।

आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥ २०१ ॥

जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे ।

आणि सांग पां केवीं निगावें । एथोनियां ? ॥ २०२ ॥

तू निर्मत्सर सदयता । येथूनि निघसील कीर माघौता ।

परी ते गती समस्तां । न मनेल ययां ॥ २०३ ॥

हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील ।

तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणें ॥ २०४ ॥

ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे ।

तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥

भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।

येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५॥

तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी ।

आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥ २०६ ॥

तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां ।

कां प्रत्यया येईल मना । सांगैं मज ॥ २०७ ॥

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।

निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६॥

हे म्हणती गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।

हा सांगैं बोलु उरला । निका कायी ? ॥ २०८ ॥

लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें ।

परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥

ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे ।

हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥

तैसी कीर्ती निःसीम । तुझ्या ठायीं निरुपम ।

तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११ ॥

दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती ।

जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥

ऐसी महिमा घनवट । गंगा जैसी चोखट ।

जया देखीं जगीं सुभट । वाट जाहली ॥ २१३ ॥

तें पौरुष तुझें अद्‍भुत । आइकोनियां हे समस्त ।

जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥

जैसा सिंहाचिया हाकां । युगांतु होय मदमुखा ।

तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥ २१५ ॥

जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें ।

तैसे अर्जुना हे तूतें । मानिती सदा ॥ २१६ ॥

तें अगाधपण जाईल । मग हीणावो अंगा येईल ।

जरी मागुता निघसील । न झुंजतुचि ॥ २१७ ॥

आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनिं अवकळा करिती ।

न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥

मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुजावें ? ।

हे जिंतलें तरी भोगावें । महीतळ ॥ २१९ ॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७॥

ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।

तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२०॥

म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी ।

आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २१॥

ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।

तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२० ॥

म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी ।

आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २२१ ॥

देखैं स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता ।

तुज भ्रांति हे कवण चित्ता । पातकाची ॥ २२२ ॥

सांगैं प्‍लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे ।

परी विपायें चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥

अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे ।

तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे । हेतुकपणें ॥ २२४ ॥

म्हणौनियां पार्था । हेतू सांडोनि सर्वथा ।

तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥ २२५ ॥

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८॥

सुखीं संतोषां न यावें । दुःखीं विषादा न भजावें ।

आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥

एथ विजयपण होईल । कीं सर्वथा देह जाईल ।

हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥

आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां ।

जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥

ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।

म्हणौनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥

एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु ।

बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९॥

हे सांख्यस्थिति मुकुळित । सांगितली तुज येथ ।

आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥

जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था।

कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥ २३१ ॥

जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।

परी जैतेसीं उरिजे । अचुंबित ॥ २३२ ॥

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।

स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४०॥

तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।

जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥

कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे ।

जैसा मंत्रज्ञु न बंधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥

तियापरी जे सुबुद्धि । आपुलालिया निरवधि ।

हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥

जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप ।

गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥

अर्जुना तें पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।

तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।

बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ ४१॥

जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी ।

तैसी सद्‍बुद्धी हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥

पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं ।

जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥

आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।

कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥

तैसी दुर्लभ जे सद्‍बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।

जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥

तैसें ईश्वरावाचुंनी कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं ।

ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥

येर ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति ।

तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥

म्हणौनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।

आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥

यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।

वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।

क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३॥

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।

व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४॥

वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।

परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥ २४५ ॥

म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे ।

मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥

येथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं ।

ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥

देखैं कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।

ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥

क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें ।

निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥

परी एकचि कुडें करितीं । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।

यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥

जैसा कर्पूराचा राशी कीजे । मग अग्नि लाऊन दीजे ।

कां मिष्टान्नीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥

दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।

तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥

सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे ? ।

परी नेणती ते काय कीजे । अप्राप्य देखें ॥ २५३ ॥

जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोलें विकी ।

तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥

म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।

तया वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।

निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५॥

तिन्हीं गुणीं आवृत । हे वेद जाणैं निभ्रांत ।

म्हणौनि उपनिषदादि समस्त । सात्विक तें ॥ २५६ ॥

येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक ।

जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥

म्हणौनि तूं जाण । हे सुखदुःखांसीच कारण ।

एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥

तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।

एक आत्मसुख अंतरीं । विसंब झणीं ॥ २५९ ॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्‍लुतोदके ।

तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥

जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले ।

तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपें ॥ २६० ॥

जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।

तरी तेतुलेहि काय चालिजती । सांगैं मज ॥ २६१ ॥

कां उदकमय सकळ । जर्‍ही जाहले असें महीतळ ।

तरी आपण घेपें केवळ । आर्तीचिजोगें ॥ २६२ ॥

तैसें ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती ।

मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥ २६३ ॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥

म्हणोनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां ।

तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥

आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेचि हें मना आलें ।

जें न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥

परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं संगति न व्हावी ।

हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गंत्यक्त्वा धनंजय ।

सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८॥

तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकुनी ।

मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥ २६७ ॥

परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।

तरी विशेषें तेथ तोषावें । हेंही नको ॥ २६८ ॥

कीं निमित्तें कोणें एकें । तें सिद्धी न वचतां ठाके ।

तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥

आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाची कीर आलें ।

परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥

देखैं जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे ।

तरी परिपूर्ण सहजें । जहालें जाणैं ॥ २७१ ॥

देखैं संतासंतकर्मीं । हें जें सरिसेंपण मनोधर्मीं ।

तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।

बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ ४९॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।

तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥ ५०॥

अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाणैं योगाचें ।

जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ २७३ ॥

तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था ।

दिसे हा अरुता । कर्मभागु ॥ २७४ ॥

परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे ।

जें कर्मशेष सहजें । योगस्थिति ॥ २७५ ॥

म्हणौनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु ।

मनें करीं अव्हेरु । फलहेतूचा ॥ २७६ ॥

जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले ।

इहीं उभयबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥ २७७ ॥

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।

जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥ ५१॥

ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।

आणि यातायाति न लोपती । अर्जुना तयां ॥ २७८ ॥

मग निरामयभरित । पावती पद अच्युत ।

ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९ ॥

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।

तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२॥

तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें यया सांडिसी ।

आणि वैराग्य मानसीं । संचरैल ॥ २८० ॥

मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान ।

तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥ २८१ ॥

तेथ आणिक कांहीं जाणावें । कां मागिलातें स्मरावें ।

हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥ २८२ ॥

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।

समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३॥

इंद्रियांचिया संगति । जिये पसरु होतसे मति ।

ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥

समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ ।

तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥

अर्जुन उवाच ।

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।

स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४॥

तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा ।

मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधी ॥ २८५ ॥

मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें ।

तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥

या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें ।

काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥

आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे ।

जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥ २८८ ॥

तो कवणें स्थिती असे । कैसेनि रूपीं विलसे ।

देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥

तंव परब्रह्म अवतरणु । जो षडगुणाधिकरणु ।

तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥

श्रीभगवानुवाच ।

प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।

आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५॥

म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।

तो अंतराय स्वसुखेंसीं । करीतु असे ॥ २९१ ॥

जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरण भरितु ।

परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥

तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे ।

तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणैं ॥ २९३ ॥

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।

वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६॥

नाना दुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।

आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥

अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।

आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्णु तो ॥ २९५ ॥

ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि ।

जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥

यः सर्वत्रानभिस्‍नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।

नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७॥

जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्णु चंद्रु कां जैसा ।

अधमोत्तम प्रकाशा- । माजीं न म्हणे ॥ २९७ ॥

ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता ।

आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळे ॥ २९८ ॥

गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे ।

जो वोखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥

ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु ।

तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।

इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८॥

कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।

ना तरी इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥

तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।

तयाची प्रज्ञा जाण स्थिति । पातली असे ॥ ३०२ ॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।

रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९॥

अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक ।

या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥

श्रेत्रादि इंद्रियें आवरिती । परि रसने नियमु न करिती ।

ते सहस्त्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥ ३०४ ॥

जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।

तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ३०५ ॥

तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांके ।

तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ३०६ ॥

येरां इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें ।

जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥ ३०७ ॥

मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे ।

जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥ ३०८ ॥

तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती ।

जैं सोहंभाव प्रतीति । प्रगट होय ॥ ३०९ ॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।

इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६०॥

येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना ।

जे राहटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥

जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी ।

जे मनातें सदा मुठी । धरूनि आहाती ॥ ३११ ॥

तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।

जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥

देखैं विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें ।

मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥

तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठोठावलें ठाये ।

ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥ ३१४ ॥

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।

वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१॥

म्हणौनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा ।

सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥ ३१५ ॥

तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण ।

जयाचे विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥ ३१६ ॥

जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु ।

जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥

येर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं ।

तरी साद्यंतुचि पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥

जैसा कां विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु ।

मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥ ३१९ ॥

तैसी विषयाची शंका । मनीं वसती देखा ।

घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।

सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६२॥

क्रोधाद्‍भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।

स्मृतिभ्रंशाद्‍बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३॥

जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती ।

संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥

जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला ।

क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥ ३२२ ॥

संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति ।

चडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥

कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्य तेजातें ग्रासी ।

तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥

मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्‍लविजे सकळ ।

तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥ ३२५ ॥

जैसें जात्यंधा पळणीं पावे । मग ते काकुळती सैरा धांवे ।

तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा ॥ ३२६ ॥

ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।

तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥

चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैशी ।

तैसें पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखैं ॥ ३२८ ॥

म्हणौनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना ।

मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥

तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन ।

तरी येसणें हें पतन । गिंवसित पावे ॥ ३३० ॥

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।

आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४॥

म्हणौनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।

मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥

पार्था आणिकही एक । जरी नाशले रागद्वेष ।

तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ॥ ३३२ ॥

जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरें जगातें स्पर्शतु ।

तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिचेनि ॥ ३३३ ॥

तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न ।

जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥

तरी विषयां तयां कांहीं । आपणपेंवांचूनि नाहीं ।

मग विषय कवण कायी । बाधितील कवणा ॥ ३३५ ॥

जरी उदकीं उदक बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे ।

तरी विषयसंगे आप्‍लविजे । परिपूर्णु तो ॥ ३३६ ॥

ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखळु ।

तयाचि प्रज्ञा अचळु । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।

प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५॥

देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।

तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥

जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।

तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥

तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ? ।

तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥

जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणें कंपु ।

तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।

न चाभावयतः शांतिरशान्तस्य कुतः सुखम् ॥ ६६॥

ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं ।

तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥

तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा ।

आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥

निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखैं मना ।

तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥

जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।

जैसा पापियाच्या ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥

देखैं अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरूढती ।

तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥

म्हणौनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें ।

या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनु विधीयते ।

तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७॥

इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।

ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥

जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता ।

तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ३४९ ॥

तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।

तरी आक्रमिला जाण दुःखें । संसारिकें ॥ ३५० ॥

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।

इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८॥

म्हणौनि आपुलीं आपणपेया । जरी इंद्रियें येती आया ।

तरी अधिक कांहीं धनंजया । सार्थक असे ? ॥ ३५१ ॥

देखैं कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।

ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥ ३५२ ॥

तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।

तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥

आतां आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।

अर्जुना तुज सांगैन । परिस पां ॥ ३५४ ॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ६९॥

देखैं भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।

आणि जीव जेथ चेइलें । तेथ निद्रितु जो ॥ ३५५ ॥

तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ।

तोचि जाणें निरवधि । मुनीश्वर ॥ ३५६ ॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।

तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्‍नोति न कामकामी ॥ ७०॥

पार्था आणीकही परी । तो जाणों येईल अवधारीं ।

जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ३५७ ॥

जर्‍ही सरितावोघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।

तर्‍ही अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥ ३५८ ॥

ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता ।

परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥

तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धीं । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।

आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ ३६० ॥

सांगैं सूर्याच्या घरीं । प्रकाशु काय वातीवेरी ।

कां न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ३६१ ॥

देखैं ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।

तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ३६२ ॥

जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।

तो केवीं रंजे पालिवणें । भिल्लांचेनि ? ॥ ३६३ ॥

जो अमृतासी ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।

तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥

पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं ।

तेथ ऋद्धिसिद्धी कायी । प्राकृता होती ॥ ३६५ ॥

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।

निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति ॥ ७१॥

ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला ।

तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ॥ ३६६ ॥

तो अहंकारातें दंडुनी । सकळ कामु सांडोनी ।

विचरे विश्व होऊनी । विश्वामाजीं ॥ ३६७ ॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।

स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ७२॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगोनाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

हे ब्रह्मस्थिति निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।

ते पावले परब्रह्म । अनायासें ॥ ३६८ ॥

जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीचि व्याकुळता ।

आड ठाकों न सके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥

तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति ।

सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥

ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें ।

आतां आमुचियाचि काजा कीर आलें । उपपत्ति इया ॥ ३७१ ॥

जें कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।

तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणौनियां ॥ ३७२ ॥

ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवाइला ।

आतां प्रश्नु करील भला । आशंकोनी ॥ ३७३ ॥

तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासी आगरु ।

कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ३७४ ॥

जो आपण सर्वज्ञनाथु । निरूपिता होईल श्रीअनंतु ।

ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ॥ ३७५ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment